सोमवार, १७ जानेवारी, २०११

वनराणी २

आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग?

********************** पुढे..

मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज.. कार्तिकातली पौर्णिमा आहे. माझ्या कुटीत चंद्र-सुर्य यांचं एकत्रित तेज घेऊन हे मुनी प्रकटले आहेत. त्यांचे डोळे.. इतके अथांग.. काय म्हणायचं असेल यांना..? माझ्यावर कोप तर नसेल झाला यांचा? मी.. मी काय करू.. असं झालं तर.. मी कुठे जाऊ.. धरणी तरी मला आधार देईल का? मला शाप दिला काही तर.... मी.. मी.. काय करू??
अरे.. हे काय मी नुसतीच त्यांच्याकडे बघत उभी आहे.. आणि मुनी.. चक्क माझ्याकडे बघून स्मित करताहेत!! हा भास आहे का??.. यांच्या दिव्य तेजाने माझे डोळे दिपून गेले आहेत..खरंच हे मुनी माझ्याकडेच बघून हसताहेत का? की.. हाही भास आहे?? .. अरे.. हे काय होतंय.. सगळं विश्व माझ्याभोवती फ़िरतं आहे..सगळं धूसर होतंय.. मी कुठे निघाले आहे...? डोळे जड झाल्यासारखे वाटताहेत.. माझा माझ्यावरचा ताबा सुटतो आहे... आणि.. हे काय..मुनी.. कुटी... पायवाट.. झाडलोट... मा' बा'... चंपा.......!

आई गं!! काय पडलं हे थंडगार?? पाणी!! कोणी सांडलं हे?? कुठे आहे मी? कुटी.. माझीच आहे!! मग... मुनीराज!! मी.. मी.. हे काय झालं मला? झोप लागली होती?? की मुर्छा?? तेच तेजस्वी डोळे.. मुनीराजांची प्रसन्न मुद्रा... नक्की काय झालं काहीच कळत नाहीये.

"बालिके, मी मातंग मुनी. मुर्छित झाली होतीस तू. आहेस कोण तू आणि आमच्या सरोवराकडे जाणार्‍या पायवाटेची स्वच्छता का करतेस तू.. ते ही केवळ हाताने?? इथे अरण्यात एकटी राहतेस?? आणि अशी लपून का राहतेस? बोल मुली बोल." मुली!!! मा' कशी आहेस गं तू?? मुनींच्या या मायेच्या बोलांनी डोळे पाणवले आहेत. काय सांगू यांना? ऐन लग्नाच्या वेळी मांडव सोडून पळून आलेय असं सांगू? की माझ्या लपून राहण्याचे कारण मी क्षुद्र आहे.. हेच आहे, असे सांगू? खूप दिवसांनी मायेने कोणीतरी पाठीवर हात फ़िरवला आहे. बा' तुमची आज खूप आठवण येतेय. घराची आठवण येतेय. कितीतरी दिवसांनी मा'ची माया मिळतेय! अरे.. हे काय..!! नाही.. रडायचं नाही.. नको.. नको...!! खूप दिवसांनी वाट मिळाल्यामुळे हे अश्रू आज ऐकत नाहीयेत... हुंदका अडकला... आणि.. मी.. मुनींच्या पायावर कोसळले.

"मुनीवर...........! मला क्षमा करा...!" मला काही बोलणंही अवघड वाटतंय. माझ्या खांद्याला धरून मुनीवर मला उठवताहेत. पण मी.. मी तर क्षुद्र आहे.
"मला.. हात नका लावू मुनीवर.. मी क्षुद्र आहे. माझी सावली पडली तरी विटाळ होईल तुम्हाला. मी... मी शबरी. भिल्ल पाड्यावरची." रडत रडत थोडी मागे सरकत बोलतेय मी. एरवी कोणी तपस्वी दिसला तरी पट्कन बुजुन जाणारी मी.. आज हे बोलण्याचं धैर्य कसं आणि कुठून आलं?

"उठ मुली. तू या अरण्यातली कंद आणतेस ना काढून? फ़ळ-फ़ुलं आणतेस ना? त्या वृक्ष लतांना स्पर्श करतेस ना? त्यांना होतो तुझा विटाळ? ही सरिता... पूर्णा.. ती कधी म्हणाली तुला.. की माझे पाणी घेऊ नकोस.. स्नान करु नकोस?? नाही ना! या परमेश्वराने चराचराची उत्पत्ती करताना मनुष्या मनुष्या मध्ये नाही फ़रक केला... तर आपण कोण आहोत उच्च -नीच ठरवणारे? नि:संकोचपणे बोल." मुनींच्या या बोलण्याने मन खूप हलकं झालंय. अगदी हलकं. पारव्याच्या पिसासारखं. मा' तू असायल हवी होतीस गं! एक स्त्री.. ती ही भिल्ल.. तिचा इतका सन्मान!! हे स्वप्न नक्किच नाहिये. ज्या दिव्य शक्तीची मला आस होती ती हीच तर नसेल?? हे तर साक्षात प्रभूचं रूप आहे. यांच्या चरणाशी अख्खा जन्म काढेन मी. हे मला शिष्या म्हणून स्वीकारतील?? मनांत किती प्रश्नांची वादळ आहेत माझ्या मनांत!!

"शबरी!! बोल मुली. तुझं मायेचं घरदार सोडून, लग्न मोडून या अरण्यात एकटीने राहण्याचं प्रयोजन काय?" अरे!! यांना कसं समजलं मी लग्न मोडून आलेय ते? मुनी शांत नजरेने आणि मार्दव भरल्या आवाजात विचारत आहेत मला,... चेहर्‍यावर तेच स्मित आहे, मागाशी होत अगदी तसंच.
"मला समजलंय सगळं. तू नेमकी कशासाठी घराबाहेर पडली आहेस याची तुला कल्पना नाहीये बाळा! नेमकं काय शोधते आहेस? ईश्वराला? तो तर तुझ्यातच आहे! त्याची प्रचिती मात्र लगेचच येईल असं नाही. " मुनी बोलत आहेत आणि माझे प्राण कानांत गोळा झाले आहेत. ज्या मार्गावर जाण्यासाठी मी धडपडत होते त्याच दिशेने मुनी मला इशारा करत आहेत. म्हणजे मी आजपर्यंत ईश्वराला शोधत होते?? माझं घर सोडणं, भोराशी विवाहाला नकार देणं , मा'ला आणि बा'ना जन्मभराच्या यातना देऊन मी बाहेर पडले ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी!! जी गोष्ट मलाच नव्हती समजली ती मुनींना समजली. मुनींच्या चरणाशी राहीले तर माझ्या जन्माचं सार्थक होईल. मला मुनींसोबत जायल हवं.

"मुनीराज, मला आपल्या चरणी आश्रय द्या. पडेल ते काम करेन मी, म्हणाल तशी राहिन. मला आश्रय द्या. ईश्वर जर माझ्यातच आहे म्हणताय तर मला माझ्या ईश्वराशी भेट घडवून द्या मुनीवर. मार्ग कितीही खडतर असुद्या.. मी नाही आता मागे हटणार. माझ्या ईश्वराची भेट झाली तरच मला मोक्ष मिळेल. जन्मभर दासी म्हणून राहीन मी तुमची. मला आश्रय द्या."
नक्की काय घडतंय हे कळायच्या आत मी हे सगळं बोलून गेले!! पण मुनींचा चेहरा असा चिंताग्रस्त का झाला? ते नकार देतील का? तसं झालं तर मी कय करू? इथेच अशीच अधांतरी भटकत राहू? माझ्या मनाला कशाची आस आहे हे आत्ता तर समजलं मला! इतके दिवस मला नक्की काय हवंय हेच समजत नव्हतं. आणि आता समजलं आहे तर.. हे मुनी मला सोबत न्यायला तयार नाहीत?? कशी लाभेल मला मन:शांती..?

माझं मलाच समजलं नाही मी मुनींच्या चरणी कधी कोसळले. वरती मान करून काही बोलवं असा विचार करतेय..
"शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत...
"मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं....

"थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर.. थांबाऽऽऽऽऽ...."

क्रमश:

1 प्रतिसाद:

मंदार जोशी म्हणाले...

जबरदस्त लेखन आहे. सुंदर लिहिलं आहेस तू.

Page copy protected against web site content infringement by Copyscape